खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश : अहिल्यानगर–संभाजीनगर रेल्वे मार्गाला गती, राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पास केंद्र सरकारची ४९४ कोटींची मंजुरी



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले खासदार निलेश लंके यांनी लोकसभा 2024 च्या रेल्वे विधेयक चर्चासत्रात अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाची जोरदार मागणी केली होती. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर ते नगर – हा संपूर्ण मार्ग आता केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा मार्ग भाविकांसाठी आणि पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी ठाम भूमिका त्यांनी संसदेत मांडली होती.


या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यानच्या २१.८४ किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गास औपचारिक मंजूरी दिली असून, ४९४.१३ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. हा मार्ग लवकरच वास्तवात येणार असून, यामुळे हजारो भाविकांना, स्थानिक जनतेला व पर्यटकांना या रेल्वे प्रवासाची  सुविधा लाभणार आहे.


तसेच या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून श्री क्षेत्र शिर्डी, देवगड आणि श्री क्षेत्र शनिशिंगणापूर  ही महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध व श्रद्धास्थानी असलेली तीर्थक्षेत्रे जोडली जाणार असल्याने, भाविक, पर्यटक आणि स्थानिक जनतेच्या सोयीसाठी हा रेल्वे मार्ग अत्यावश्यक आहे, 

तसेच या प्रकल्पामुळे स्थानीय पर्यटन, अर्थव्यवस्था, रोजगार आणि व्यापारी संधींना मोठी चालना मिळणार असल्याचे महत्व खासदार निलेश लंके यांनी अधोरेखित केले आहे.

छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हा महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्ग पूर्णपणे सर्वेक्षणाच्या टप्प्यातून यशस्वीरीत्या पार पडला असून लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार आहे.  हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुमारे 84 किलोमीटरचा असून यामध्ये वाळुंज नेवासा फाटा देवगड राहुरी शनिशिंगणापूर व वांबोरी असा प्रवास मार्ग असणार आहे.  या संपूर्ण मार्गाला धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्व असून, याच मार्गातील हा पहिला टप्पा – राहुरी ते शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रेल्वे प्रकल्प – आता प्रत्यक्ष मंजुरीच्या दिशेने पुढे गेला आहे.


या मार्गावरील शिर्डी श्री क्षेत्र देवगड व  शनिशिंगणापूरला दैनंदिन लाखो भाविक भेट देतात. या अनुषंगाने खासदार निलेश लंके यांनी या तीर्थक्षेत्रांना जोडणारा असा एक रेल्वे मार्ग असावा अशी मागणी लोकसभेमध्ये केली होती. या मार्गावर इतरही अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे देखील येतात. त्यामुळे या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला, स्थानिक रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.


खासदार निलेश लंके यांनी या मागणीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांच्याशी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या पहिल्या टप्प्यातील राहुरी शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गाच्या मंजुरीमुळे त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून लवकरच अहिल्यानगर–संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामासही प्रारंभ मिळण्याची दिशा निश्चित झाली आहे.

हा मार्ग म्हणजे केवळ रेल्वे प्रकल्प नसून, श्रद्धा, पर्यटन आणि विकास यांना जोडणारा सेतू ठरणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले.

संवेदनशील नेतृत्व आणि जनतेसाठी झटणारा खासदार

 निलेश लंके यांच्या या ऐतिहासिक निर्णयास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून त्यांचे नेतृत्व, कार्यशैली आणि विकासदृष्टीचे कौतुक केले जात आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post