खा. विखे यांची उमेदवारी आ. शिंदे मान्य; केले मोठे आवाहन



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर / यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. मात्र दुसऱ्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.


दरम्यान, सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक नगर मध्ये संपन्न झाली आहे. यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे उमेदवार सुजय विखे, अभय आगरकर यासह पदाधिकारी उपस्थित राहिले होते.


आमदार राम शिंदे हे नगर दक्षिण मधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी वेळोवेळी आपली ही मनातली इच्छा बोलूनही दाखवली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी सुजय विखे यांच्यावरच यावेळीही विश्वास दाखवला आहे. यामुळे राम शिंदे सुजय विखे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर होत असलेल्या या आढावा बैठकीत हजेरी लावणार का हा मोठा प्रश्न होता.


पण, आमदार राम शिंदे यांनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका रांजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह उपस्थित भाजपाच्या इतर नेत्यांनी पुन्हा एकदा सुजय विखे पाटील हेच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.



शिंदेंना सुजय विखे यांची उमेदवारी मान्य 

भाजपाच्या या आढावा बैठकीत आमदार राम शिंदे यांनी दीड मिनिटाचे भाषण केले. या आपल्या दीड मिनिटाच्या भाषणात त्यांनी असे म्हटले की, मी सुद्धा खासदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक होतो. पण पक्षाने सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. ती उमेदवारी मी मान्य करतो. तसेच त्यांनी सुजय विखे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.


या बैठकीला पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी यांनी कुठल्याही लंकेच त्या ठिकाणी राज चालणार नाही किंवा कुठल्याही लंकापतीचं या ठिकाणी अस्तित्व टिकणार नाही हे निश्चितपणाने मी आपणास सांगू इच्छितो असे म्हणतं सुजय विखे पाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 


सुजय विखे पाटील यांचा माफीनामा 


या बैठकीत सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची माफी देखील मागितली. यासाठी त्यांनी जाहीर माफीनामाच सादर केला होता. यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या माफीनाम्याची देखील मोठी चर्चा झाली आहे. ते आपल्या भाषणात असे म्हटले की, ‘पाच वर्षांचा कार्यकाल खडतर होता. या कार्यकाळात आपण सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, परंतु पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कुणी दुखावले गेले असतील तर त्यांची मी माफी मागतो.


ना पंतप्रधान बदलणार, ना खासदार बदलणार !


या बैठकीनंतर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विखे पाटील यांनी ‘भारतीय जनता पक्षाचा एक अलिखित नियम आहे की, आम्ही सारे जण मोदीजींसाठी आहोत. इथं कोण मोठा, कोण लहान, कोण उमेदवार, कोण उमेदवार नाही हा विषयच नसतो.मी हे पहिल्या दिवसापासून म्हणतोय की जर उमेदवारी मला नसती मिळाली, जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मिळाली असती तर मी त्यांच्यासाठी भाषण केलं असत.


आज संघटनेसाठी आम्ही सगळे एक आहोत. आमच्या पूर्ण प्रणालीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने काम करू आणि जो उत्साह आज मला या बैठकीत पाहायला मिळाला तो उत्साह एक वेगळ्या लेव्हलचा होता आणि याच्यातून निकाल काय लागेल हे सिद्ध झाले आहे,’ अस म्हणतं पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.


तसेच यावेळी पत्रकारांनी सुजय विखे यांना आचारसंहिता जाहीर होऊनही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाहीये, याकडे तुम्ही कसं पाहता असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना सुजय विखे यांनी, उमेदवार उद्या जरी आला, परवा जरी आला, तेरवा जरी आला तरी ना निकाल बदलणार आहे, ना खासदार बदलणार आहे, ना पंतप्रधान बदलणार आहे असे म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post