पाण्याच्या टँकर साठी उपोषणाचा इशारा बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर गावात भीषण पाणीटंचाई

माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका--नगर तालुक्यातील बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी या गावांनी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा भाजप तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी दिला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या गावांनी भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. प्रस्ताव पाठवून देखील टॅंकर सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती सुरू असून यात्रोत्सव देखील पार पडले तरी पाण्याचे टॅंकर सुरू झाले नाही. गावे डोंगर उतारावर वसलेले असल्याने उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याची टंचाई जाणवते.

     उन्हाळा संपत आला तरी टँकर सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या तिन्ही गावांनी दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. या गावांसाठी कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू नसल्याने नागरिक तसेच पशुधनाचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे तिन्ही गावांनी तात्काळ टँकर सुरू न केल्यास भाजप तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

_____________________________

 दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती

 या गावांनी कितीही पाऊस झाला तरी डोंगरउतारामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. प्रशासनाकडून तात्काळ टँकर सुरू करणे गरजेचे आहे. प्रस्ताव व कागदोपत्री परवानगी मिळण्यात उन्हाळा निघून जात आहे. नागरिकांचे अतोनात हाल होतात त्यामुळे आता उपोषणा शिवाय पर्याय नाही.

..... राजू दारकुंडे (भाजप तालुका उपाध्यक्ष )

____________________________________

वन्यप्राण्यांचे ही अतोनात हाल 

बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी वास्तव्यास आहेत. येथे काही ठिकाणी वन विभागाने पाणवठे बनवलेले आहेत. पण त्यात पाणी सोडण्यात येत नाही. त्यामुळे या परिसरात वनविभागाने वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

...... दत्तात्रय जरे (सरपंच, ससेवाडी)

_____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post