मुंबईच्या डबेवाल्यांसाठी यंदाची दिवाळी काळी ठरणार?

 


माय अहमदनगर वेब टीम

 मुंबई - अवघ्या १० दिवसांवर दिवाळी आलेली असताना सर्वसामान्यांसाठी लोकलफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. याचे गंभीर परिणाम समाजातील विविध घटकांवर होत आहेत. मुंबईतील डबेवाल्यांचा व्यवसाय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. ग्राहकच घरी असल्याने लोकल असून नसल्यासारखी असल्याचे डबेवाले सांगतात. हीच स्थिती कायम राहिल्यास आर्थिक कोंडीमुळे यंदाची दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरण्याची शक्यता आहे.


लोकलमधील गर्दी नियोजनाची बैठकच रखडल्याने सुमारे ६५-७० लाख प्रवाशांचा लोकलप्रवासाला बसलेली खीळ कायम आहे. राज्य सरकारकडून बैठक आयोजित करण्यात येणार आहे. गर्दी विभागण्यासाठी कार्यालयीन वेळ बदलाबाबत सरकारकडून काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सद्यस्थितीत जवळपास १०-१५ लाख अत्यावश्यक प्रवासी लोकल फेऱ्यांमधून प्रवास करत आहे.एकीकडे भूमिपूत्र असलेला डबेवाला आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे बहुतांश परप्रांतीय असलेल्या असंघटित कामगारांना पाच हजारांची आर्थिक मदत राज्य सरकारने केली. डबेवाल्यांची यात नोंद असूनही त्यांना मदत मिळाली नाही. आधीच काम नाही. आता आर्थिक मदतीची आशी ही संपुष्टात आली आहे. या स्थितीत जेवणाची चिंता भेडसावत असताना तोंडावर आलेली दिवाळी मुंबईतील डबेवाल्यांसाठी काळी दिवाळी ठरणार आहे, असे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post