राज्यपालांच्या 'त्या' पत्राबाबत शरद पवार नाराज



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मंदिरं उघडण्यासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखं भासत असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचं सांगितलं आहे.

शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे की, “सध्या आपण सर्वजण करोना संकटाशी लढत आहोत. करोनाला रोखण्यासाठी तुम्ही अंतर ठेवण्यासंबंधी घोषणा दिली होती. महाराष्ट्रात मुक्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘माझं घर माझं कुटुंब’ मोहीम राबवण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगबद्दल शिक्षण दिलं जात आहे”. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करताना राज्यात अनेक महत्त्वाची धार्मिकस्थळं असल्याचं म्हटलं आहे. “सिद्धिविनायक, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर तसंच इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसल्याचं,” त्यांनी सांगितलं आहे.


“राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची प्रतही जोडली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post