खरंच करोनावर नियंत्रण की पाकिस्तानचा झोलझाल?

 


माय अहमदनगर वेब टीम

इस्लामाबाद: करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनेही जगाला पाकिस्तानकडून शिकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अनेकांच्या नजरा पाकिस्तानकडे वळल्या आहेत. करोनाला अटकाव केल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानमध्ये आता शाळा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. 


पाकिस्तानमध्ये बाधितांची संख्या कशी कमी झाली?

पाकिस्तान आधीपासून बिकट आरोग्य व्यवस्था, आर्थिक संकटाचा सामना करत होता. अशातच एप्रिल-मे-जून या महिन्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. त्यानंतर अचानक नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे समोर आले. अचानकपणे कमी झालेल्या संख्येमुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अनेक पाकिस्तानी माध्यमांनी आपल्या वृत्तांमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील आयसीयू पूर्ण भरले असल्याचे म्हटले होते. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची भटकत असल्याचेही समोर आले होते. अशा स्थितीत करोनाचा कहर कमी होणे हे एखाद्या चमत्कारासारखेच आहे. 

पाकिस्तान सरकारचे वाकडे पाऊल 

करोनाच्या संसर्गामुळे देशात असंतोष वाढत होता. या असंतोषाला रोखण्यासाठी इम्रान खान यांच्या सरकारने करोना चाचणी कमी केली. भारतासह इतर अनेक देशांमध्ये करोना चाचणीचे प्रमाण वाढत आहे. तर, पाकिस्तानमध्ये चाचणीचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळेच करोनाबाधितांची संख्या कमी आढळली जात असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानमध्ये एका दिवसात ३० हजार करोना चाचणी केली. ही संख्या आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. 

करोनावर नियंत्रण की झोल?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या तुलनेत पाकिस्तानची लोकसंख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील १० लाख नागरिकांमध्ये १४०० इतके करोना चाचणीचे प्रमाण आहे. तर, भारतात हेच प्रमाण ३७०० च्यावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०जणांची करोना चाचणी केल्यास एक करोनाबाधित आढळत असल्यास करोना नियंत्रणात असल्याचे म्हटले जाते. मात्र, पाकिस्तानमध्ये करोना चाचणीच्या दरम्यान, प्रत्येक आठवी व्यक्ती ही करोनाबाधित आढळते. भारतात दर ११ वी व्यक्ती बाधित आढळते. 

पाकिस्तानमध्ये सोमवारी करोना संसर्गाचे नवीन ५३९ रुग्ण आढळले. पाकिस्तानमध्ये तीन लाख दोन हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी चारजणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ६३८३ इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, दोन लाख ८९ हजारजणांनी करोनावर मात केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post