प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील पथदिव्यांमध्ये मोठा घोटाळा




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, टी.व्ही. सेंटर ते झोपडी कॅन्टीनपर्यंत अद्ययावत पथदिवे उभारणीच्या 50 पोलच्या कामाची निविदा सुमारे 50 लाख रुपयांची निविदा काढून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. प्रत्यक्षात प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौकापर्यंत 48 पोल उपलब्ध आहे. यामध्येही दोन पोल गहाळ आहेत. काही पोलवर दिवेसुद्धा नाहीत. बसविल्यापासून एकदाही लाईट लागले नाही. या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरुन हा प्रकार नगरकरांच्या पुढे आला आहे. एक पोलची किंमत सुमारे 93 हजार आहे. तरी झोपडी कॅन्टीन, मकासरे हेल्थ क्लब, टी.व्ही. सेंटर या ठिकाणी तर पोलच बसविण्यात आले नाहीत. तत्कालीन महापौर बाबूचा लाखाचा पोल, नुसता झोलच झोल, तरी या कामाची त्रयस्त चौकशी समिती लावून, लवकरात लवकर अहवाल सादर करावा व संबंधितांवर कायदेशीर गुन्हे
दाखल करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केलंी आहे.

 प्रोफेसर कॉलनी व इतर परिसरातील पथदिव्याची पाहणी विरोधीपक्ष नेते बारस्कर यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक अविनाश घुले, निखील वारे, डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, बाबासाहेब गाडळकर, विद्युत विभागाचे आर. जी. मेहेत्रे व अमित खामकर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना विनीत पाऊलबुद्धे म्हणाले की, नगर शहरातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी अशा प्रकारे होत असेल तर, संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. प्रत्येक कामाची गुणवत्ता तपासली पाहिजे.

एक लाखाच्या पोलवर जर दिवेच बसविले नसेल तर प्रकाश कुठून पडणार. 50 लाख रुपयांच्या कामाचा उपयोग झाला कोणासाठी? असा सवाल उभा राहतो. तरी लवकरात लवकर या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे ते म्हणाले.

माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, बीआरजीएफमधून 50 लाख रुपयांची निविदा काढून अर्धवट पोल बसविण्याचे काम केले. या पोलवर दिवेसुद्धा ही बसविले नाही, तसेच झोपडी कॅन्टीन, मकासरे हेल्थ क्लब व टी.व्ही.सेंटर दरम्यान एकही पोल अस्तित्वात नाही. या निविदा प्रक्रिया मंजुरीसाठी महासभा व स्टँडींगमध्ये किती तारखेला मंजुरी मिळाली, याची माहिती देण्यात यावी. तरी सविस्तर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

विद्युत विभागाचे आर. जी. मेहेत्रे म्हणाले की, लवकरात लवकर त्रयस्त समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व सत्य परिस्थितीचे अहवाल तयार करुन आयुक्तांसमोर ठेवले जाईल त्रुटी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post