काम सुरू होई पर्यंत शिवसेना शांत बसणार नाही



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शिवसेनेने केलेल्या सततच्या पाठपुरावा व प्रयत्नातून तपोवन रस्त्या व बोल्हेगाव रस्त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून मोठा निधी मिळाला. मात्र त्यांनी या कामाचे श्रेय लाटण्याबरोबरच ठेकेदाराशी संगनमत करत आणखी काय काय लाटले हे सर्वांना माहिती आहे. तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या कामात झालेला मोठा भ्रष्टाचार शिवसेनेने उघकीस आणला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीमुळे आता या कामाची तपासणी करण्यासाठी तज्ञांची टीम आली आहे.

तपोवन व बोल्हेगाव या दोन्ही प्रमुख रस्त्यांचे काम परत नव्याने सुरु होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असलेल्या तपोवन व निंबळक बाह्यवळण ते बोल्हेगाव रस्ताच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी करत कामाची चौकशी व तपासणी करण्याची तक्रार सरकारकडे केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पुणे कार्यालयाने या कामांची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी (नागपूर) यांनी तपोवन रस्त्याची पाहणी केली. तसेच बोल्हेगाव रस्त्याची पाहणी व तपासणी केली.

कामाचा दर्जा, वापरलेल्या डांबराची, खडीकरणाची तपासणी करतांना माजी महापौर अभिषेक कळमकर, आकाश कातोरे यांनी बोल्हेगाव रस्त्याची झालेली दुरवस्था तपासी अधिकार्‍यांना दाखवली. यावेळी शिवसेनेचे मदन आढाव, निलेश भाकरे, अंबादास शिंदे, रमेश वाकळे आदींसह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आकाश कातोरे म्हणाले, बोल्हेगाव रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. मुख्यमंत्री निधीतून या रस्त्यासाठी मिळालेल्या मोठ्या निधीतून दर्जेदार रस्ता होणे अपेक्षित होते. मात्र या ठेकेदाराने कामात मोठा भ्रष्टाचार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता केला आहे.

पहिल्याच पावसात नवा रस्ता वाहून गेला आहे. तसेच पडलेले खड्डे बुजवण्यासाठी केलेले पॅचवर्कही पूर्ण उखडले आहे. त्यामुळे या रस्त्याची पूर्ण चाळणी झाल्याने नागरिकांना कसरत करत ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याच्या कामास सुरुवात होत नाही तोवर शिवसेना आंदोलन करणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post